जावळी तालुक्यात सध्या ज्वारी काढणीचा हंगाम सुरू आहे.यात आज सायंकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाटात पावसाला सुरुवात झाली.यामध्ये शेतात ज्वारी काढत असताना अंगावर वीज पडून आलेवाडीतील गणेश जगन्नाथ दुटाळ वय 34 वर्ष यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या धक्कादायक घटनेमुळे दुटाळ परिवारासह आलेवाडी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील कर्ता पुरुष म्हणून गणेश दुटाळ हे कुटुंबाचा संभाळ करत होते.आज दुपारी ते शेतात आपल्या कुटुंबा समवेत ज्वारी काढत असताना अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊसास सुरुवात झाली. यावेळी शेतात ज्वारी काढत असणाऱ्या गणेश दुटाळ यांच्या अंगावर वीज कोसळली.यामध्ये ते गंभीर स्वरूपात भाजले व त्यांचा जागीच मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात आई भाऊ पत्नी असा परिवार आहे.
या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर महसूल विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी दाखल झाले.त्यांच्या अपघाती मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे.तसेच सध्या जिल्ह्यासह जावळी तालुक्यातील वातावरण बदलले असून विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होत आहे.यातच शेतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून शेतकऱ्याची धावपळ सुरू झाली आहे.तरी सर्वांनी शेतात जाताना हवामानाचा अंदाज घेऊन काळजी घ्यावी असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.